महाराष्ट्रातल्या पालघर, रायगड या जिल्ह्यांतील जंगलात कातकरी मोठ्या संख्येने राहतो. कायम भटकत राहीलेल्या या समाजातील लोक कुंटुंब व्यवस्था त्यातून तयार झालेले नातेसंबंध यापासून अजून ही लांब आहेत. विट भट्टी, कोळसा तयार करणे आणि पूर्वीच्या तुलनेत फारच कमी झालेला कात तयार करण्याचा व्यवसाय हे लोक करतात. आईबापांच्या पोटी सीमाचा ( बदललेले नाव) जन्म झाला.
advertisement
वयात आल्यापासून सीमाचा वनवास सुरू झाला कारण विक्री करण्यासारखी वस्तू बनली होती. ११-१२ वर्षांची असताना सीमाचे वडील वारले आईने सीमाला आजीकडे ठेऊन दुसरं लग्न केलं. म्हाताऱ्या आजीला दलालांने गाठलं. तू मुलीचा सांभाळ करण्याचं ओझं का घेते मी तिचं लग्न लावून देतो आणि तुला पैसे ही देतो असे सांगून दलालाने आजीकडून शब्द घेतला.आजी पुढल्या काही महिन्यात मेली पण तिचा शब्दाचा आधार घेऊन दलालाने सीमाचा सौदा केला..
सीमाच्या आईचा लग्नाला नकार होता. पण तू दुसरं लग्न केलं आता तुझा मुलीवर अधिकार नाही, तू फक्त हळदी कुंकवाला ये असं सांगून अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी नेले. हळदी कुंकू सांगून त्यांच ठिकाणी लग्न उरकण्यात आले. गावातल्या १५०-२०० लोकांपुढे सीमाची आई आणि सावत्र बापाचा विरोध टिकला नाही. २०२२ मध्ये सीमाचं लग्न झालं पुढं वर्षभर तिने नवरा, चुलत सासू सासरे यांच्या बरोबर संसार केला. त्यातून ती गरोदर राहिली. हे कळताच तिचं वय वाढवून नव्याने तयार करण्यात आलेल्या आधारकार्डवर तिचे नाव नोंदविण्यात आले. तिला २०२३ मध्ये छान गोड अशी मुलगी झाली. पण सीमाच्या सासरच्यांना वंशाचा दिवा हवा होता आणि इथूनच सिमाला माघारी पाठवण्याची तयारी सुरू झाली. तिला छळण्यात आलं एक वेळ जेवण दिलं, घरात शेतात राबवलं एवढच नाही तर संशय घेऊन मारहाण केली जाऊ लागली. नवरा तर चक्क माझ्या मनाविरूद्ध लग्न झालं मी दलालाला दिलेले ५० हजार रूपये परत कर असे सांगू लागला. त्यानंतर सीमाला महिन्याभरापूर्वी चिमुल्या लेकीसह परत पाठवून दिलं.
लग्न करायला मुलगी पाहिजे म्हणून मुली विकत घेणाऱ्या या कुटुंबानं तिच्या पोटी मुलगी जन्माला आली म्हणून सीमाला हाकलून दिलं. जी स्वता:च बाल वयात होती ती आज आई झाली आहे. मुली या केवळ उपभोगाची आणि मोलमजुरी करून घेण्याची वस्तू समजणाऱ्या या मानसिकतेवर काय बोलावे.. लग्न न होण्याच्या समस्येवर अल्पवयीन मुली विकत घेण्याचा उपाय अजून भीषण आहे. आपल्यावर सामाजिक स्थितीमुळे अन्याय होऊ नये म्हणून आपण दुसऱ्याचे शोषण केले तरी चालते, मुलींना जनावरापेक्षा वाईट वागणूक देणाऱ्या सर्वांना जन्माची अद्दल घडली पाहिजे, अशी भावना ही प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या श्रमजीवी संघटनेला वाटते.
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित
कातकरी समाजातील मुली या अश्या गुन्ह्याच्या बळी ठरत आहेत. अनिष्ट रितींसाठी या समाजातील मुलींचा बळी जात राहीला तर पुढल्या काही वर्षात कातकरी समाज हा संपुष्टात येईल. मानवाच्या उत्क्रांती पासून आजवर टिकलेली हा जमात महाराष्ट्राच्या नकाशामधून गायब होईल. सुज्ञ म्हणवणारे आपण या अशिक्षित मागास जमातीला वाचवू शकू का? त्यासाठी काही प्रयत्न करू शकू का हा खरा सवाल आहे.