जळगाव, 29 डिसेंबर : जळगावच्या मेहरून तलावामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेली चार मुलं बुडाली, यातल्या तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एका 13 वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. परिसरातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने तीन मुलांना वाचवण्यात यश आलं. घटनेनंतर तलावर परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोठी गर्दी झाली.
advertisement
जळगाव शहरातील मेहरून तलावामध्ये शाहू नगर परिसरातील 13 वर्षांची चार मुलं पाण्यात बुडाली. यातला इशान शेख वसीम याचा मृत्यू झाला तर इतर तिघांनाही वाचवण्यात यश आलं.
शाहू नगर परिसरात राहणारे इशान शेख, मोईन खान अमीन खान, अयान तस्लीम भिस्ती आणि असलम शेख सलाउद्दीन हे शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तलावात अंघोळीसाठी गेले, पण चौघंही पाण्यात बुडत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. यानंतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तिघांना वाचवलं, मात्र एकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर तलाव परिसर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नागरिकांची गर्दी झाली होती.
