साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्याचे रात्रीचे सरासरी तापमान १४ ते १५ अंश सेल्सियसच्या आसपास असते. मात्र, यावर्षी थंडीची लाट अत्यंत तीव्र असून, पारा ९ ते १० अंशांवर घसरला आहे. म्हणजे सरासरी तापमानात तब्बल ४ अंशांनी मोठी घट झाली आहे.
२३ वर्षांचा विक्रम मोडीत
आज नोंदवलेल्या ७.१ अंश सेल्सिअस तापमानामुळे २००२ मध्ये नोंदवलेला ७.४ अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तापमान सातत्याने खाली जात असल्यामुळे जिल्ह्याचे वातावरण पूर्णपणे गारठून गेले आहे.
advertisement
पहाटेच्या वेळी तर शहरात धुक्याची दाट चादर पसरल्यामुळे एक मनमोहक, पण तितकेच गारठलेले वातावरण तयार झाले होते. या तीव्र थंडीमुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असली तरी, मानवी जीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
थंडीचा जोर अजून वाढणार
सध्या जिल्ह्यात सुरू असलेली ही तीव्र थंडीची लाट पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्यातच इतकी थंडी पडत असल्याने, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
