जळगावच्या धरणगाव महावितरण कार्यालयात 'झिरो वायरमन' म्हणून ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या दिलीप देवा भिल याचा कामादरम्यान इलेक्ट्रिक खांबावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिलीप भील हा धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरात नेहमीप्रमाणे विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना हा अपघात घडला. नेमका शॉक लागून की तोल जावून पडला,हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिलीपला सहकाऱ्यांनी तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
दिलीप हा गेल्या 10 वर्षांपासून झिरो वायरमन म्हणून काम करत होता आणि तो गारखेडा येथे कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शोकाकुल आई-वडीलांचा आक्रोश उपस्थितांना भावुक करणारा होता. दिलीप हा कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य होता. त्यामुळे एकलव्य संघटनेने या प्रकरणी महावितरणकडून आर्थिक मदतीची ठोस मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.
तंबाखू न दिल्याने दगडाने ठेचून हत्या
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये तंबाखू न दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पैलाड भागातील हेडावे नाक्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी निखिल विष्णू उतकर (रा. करंजा, पंचवटी, नाशिक) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव मुकेश भिका धनगर (वय ३८, रा. पैलाड) असे आहे. रात्री ११ वाजता मुकेश घराबाहेर गेला असताना हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचा आरोपी निखिल उतकरसोबत वाद झाला. तंबाखू दिली नाही यावरून हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुकेशचा भाऊ दिनेश भिका धनगर याला याची माहिती मिळताच तो घटनास्थळी पोहोचला. त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी निखिलने दिनेशलाही दगड मारला.