संतोष देशमुख यांची हत्या, बदलापुरातील चिमुरडीवर अत्याचार प्रकरण तसेच पुण्यातील आरोग्य सहाय्यक तरुणीवर बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड झाल्याने खरंच महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय. हाच प्रश्न रक्षा खडसे यांनीही उपस्थित केला.
घटना नेमकी काय आणि कशी घडली? रक्षा खडसे यांनीच सांगितलं
advertisement
इथे मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा असते. त्या यात्रेच्या निमित्ताने माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी परवा रात्री तिथे आकाश पाळण्यात बसण्यासाठी गेल्या. त्यांच्यासोबत मी माझ्या घरच्या गार्डला पाठवलं होतं. कारण मी इथे नसल्यामुळे ती मला विचारुन गेली. गार्ड आणि माझ्याकडे काम करणारे 2-3 मुलं तिच्यासोबत गेले होते. मुक्ताईनगरमध्ये काही मुलं आहेत, जे नेहमी वॉन्टेडमध्ये आहेत. ज्यांच्याकडून याआधीही असे प्रकार झाले आहेत. त्या मुलांनी पाळण्यात बसताना माझ्या मुलीला धक्काबुक्की केली, त्यांचे व्हिडीओ देखील काढले आणि माझ्या गार्डला देखील त्यांनी धक्काबुक्की केली. त्याची कॉलर पकडली.
प्रश्न एवढाच आहे की आज माझी मुलगी सेफ नाहीये तर बाकीच्या मुलींचा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या मुलांची हिम्मत एवढी वाढलेली आहे की, मुलींच्या सोबत गार्ड असतानाही असे प्रकार मुक्ताईनगरमध्ये घडत आहेत. एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे की या घटनेला न दाबता इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी तक्रार केली आहे. अशा प्रवृत्तींना पूर्णपणे ठेचलं पाहिजे, अशी भावना रक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
तसेच मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षकांकडे मी तक्रार दाखल केली आहे. कारवाईची माहिती घेतली आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, असेही रक्षा खडसे यांनी सांगितले.
आरोपी मोकाट, पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही
गुन्हा घडूनही संबंधित आरोपींवर कोणताही कारवाई झालेली नाहीये. पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावे लागले. त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. संबंधित घटनेच्या कारवाईची माहिती मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकांनी खडसे यांना दिली.
