पुतळ्याचा वाद पोलीस आयुक्तालयात
जळगाव शहरातील महापालिकेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार या पुतळ्याचे अनावरण हे मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे, या संदर्भात या कार्यक्रमाला विरोध करत भाजपचे नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन दिलं आहे. तर याच पुतळ्याच्या अनावरणावरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधक हे गेल्या काही दिवसांपासून आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या या पुतळ्याचा वाद पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
advertisement
वाचा - '1 रुपयात पीक विमा हे थोतांड, प्रत्यक्षात..' दुष्काळी दौऱ्यातून ठाकरेंचा हल्लाबोल
पोलीस अधीक्षक कार्यालयात आज महापालिका सत्ताधारी ठाकरे गट तसेच विरोधकातील भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. यात पोलीस अधीक्षकांनी दोन्हीकडच्यांची समजूत घालत सामंजस्याने कार्यक्रम पार पाडावा, असं आवाहन केलं. मात्र, या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही. आता रात्री एका खाजगी ठिकाणी दोघांकडे पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कुठलाही वाद अथवा विरोध नसून या पुतळ्याचं अनावरण हे उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच पार पडणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंचा दुष्काळी दौरा
उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळाच्या परिस्थतीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे पाऊस सुरू असतानाही उद्धव ठाकरेंनी दौरा सुरुच ठेवला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
