जळगाव : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. खोल दरीत कोसळलेल्या बसमधील १४ ते १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
advertisement
नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झालाय. बसमधील १४ पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, पिंपळगाव, तळवेल या गावातले आहेत. हे 16 तारखेपासून अयोध्या नेपाळ इथं काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास ठरला होता. यासाठी त्यांनी दोन बसेस उत्तर प्रदेशातून बूक केल्या होत्या.
पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा इथं पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते.
