जालना : महाराष्ट्राच्या मातीला जाज्वल्य इतिहास लाभला आहे. याच इतिहासाच्या पाऊलखुणा पावलोपावली आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी प्राचीन शिलालेख, मूर्ती इत्यादी आढळतात. त्यामुळे आणखी एकदा इतिहासाला उजाळा मिळतो. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव या गावामध्ये तब्बल 11 व्या शतकातील एक शिलालेख आढळला आहे. या शिलालेखावर लिहिण्यात आलेल्या अक्षरांची जुळवणी करण्यात इतिहास अभ्यासकांना यश आले आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या शिलालेखावर लिहिण्यात आलेली अक्षरे देखील मराठीतच असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या शिलालेखावर लिहिण्यात आलेल्या अक्षरांबाबत लोकल 18 ने इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे यांच्याकडून माहिती घेतली.
advertisement
या गद्यगळ रुपी शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी केले आहे. शिलालेखात 'सालुक' म्हणजेच चालुक्य वंशातील राणक 'अय्यण' याने केलेल्या एका दानाची नोंद केलेली आहे. 11 व्या शतकात कल्याण येथील चालुक्य घराण्याचे दक्षिण भारतावर राज्य होते. त्या घराण्यातील 'विक्रमादित्य पाचवा' याचा 'अय्यण दुसरा' या नावाने ओळखला जाणारा एक भाऊ असून तो विक्रमादित्यानंतर अल्पकाळ राज्यावर आला होता. प्रस्तुत शिलालेखातील अय्यण हा एकतर अय्यण दुसरा किंवा त्याचा कुणीतरी थेट वंशज असावा असा पिंगळे यांचा तर्क आहे.
‘सामना’ची प्रत अन् दीड मिनिटांचा तो कॉल, कट्टर शिवसैनिकाने सांगितला बाळासाहेबांसोबतचा प्रसंग
अय्यण दुसरा याने सत्तासंघर्षामुळे गोदावरीच्या उत्तरेकडे स्थलांतर करून स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात त्या प्रदेशावर शासन केले असावे कारण त्या प्रदेशात चालुक्यांच्या मुख्य शाखेच्या अस्तित्वाचे फारसे पुरावे मिळत नाहीत. तसेच 12 व्या शतकाच्या उत्तरार्धातील यादव राजा भिल्लमदेव पाचवा याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन करतेवेळी मराठवाड्यातील काही लहान शासकांना पराभूत केल्याच्या उत्तरकालीन साधनांतील उल्लेखांवरूनही या शक्यतेला दुजोरा मिळतो. या विषयावर विस्तृत शोधलेख लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. प्रस्तुत शिलालेख संपूर्णतः मराठी भाषेत असून अकराव्या शतकातील मराठी भाषेचा नमुना म्हणून महत्त्वाचा आहे.
गद्यगळ अर्थात दान केल्याचा लेख असून ज्यास दान केले आहे त्याने मिळालेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्यावा असे वचन असते. वचन मोडल्यास त्याच्या घराण्यास शिव्याशाप लागेल. प्रस्तुत गद्यगळावर सूर्य, चंद्र, गर्दभ आणि कोरीव लेख असून 2018 पासून गद्यगळाचे संशोधन वाचन सुरू असल्याचे लांडे यांनी सांगितले.
किनगाव येथील अकराव्या शतकातील मराठी गद्यगळ (शिलालेख) असून त्यावरील चार (1) ओळीचा लेख कोरलेला आहे.
1. सालुकरु वंश समुधरणु* कुलटील
2. कु अयणु राणक यः तेहची* दती 1 द
3. पौत* मईषी* प्रेमू लुसभु ननय*
4. जौ लोपी तौ श्वनु* चाडलु* गअभ*
अक्षरे एकत्रित करून संदर्भीय ग्रंथानुसार चालुक्य वंशातील 'अयणु' अर्थात 'अय्यण' राणक नामक शासकाने काही दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आला आहे. दानाची रक्कम 1 द (दम्म दाम) एवढी असून इतर तपशील नोंदवलेले नाहीत. हे दान बहुधा स्थायी स्वरूपाचे, अर्थात दर महिन्यासाठी किंवा वर्षासाठी असावे. दात्याने आपली नातवंडे आणि पट्टराणीच्या प्रेमापोटी ते दिले असे पुढील संदर्भावरून दिसते. परंतु हे दान कुणाला आणि कशासाठी दिले याची माहिती दिलेली नाही. स्थलनामांचाही कुठलाच उल्लेख नाही. शिलालेख पुष्कळसा खाजगी स्वरूपाचा असल्यामुळे तो त्रोटक आहे, असं इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी सांगितले.





