जालना : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. अनेक जण आपल्या वाढदिवशी, एनिव्हर्सरीला किंवा महत्त्वाच्या दिवशी रक्तदान करण्यास प्राधान्य देतात. रक्तदान केल्याने आपले शरीर देखील निरोगी राहते. रक्तदानाविषयी असलेले अनेक गैरसमज आता जनजागृतीमुळे दूर देखील झाले आहेत. त्यामुळे बहुतेक जण रक्तदान करण्यास तयार होतात. एक-दोन वेळा किंवा सात-आठ वेळा रक्तदान करणारे आपल्या आजूबाजूला असंख्य असतील. मात्र जालना शहरातील 63 वर्षीय पुसाराम मुंदडा यांनी एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 124 वेळा रक्तदान केला आहे. जालना शहरातील जनकल्याण रक्तपेढीचे ते संचालक आहेत. पाहुयात मुंदडा यांना एवढ्या वेळा रक्तदान करण्याची प्रेरणा कशी मिळाली.
advertisement
पुसाराम मुंदडा हे मागील 35 वर्षांपासून गुळ विक्रीच्या व्यवसायात आहेत. एके दिवशी खेडेगावातील एका व्यक्तीला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. गुळाच्या आडत दुकानावर असतानाच त्यांना याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. रक्तदान केल्यानंतर त्यांना फार हलकं वाटू लागलं तसेच रक्तदान केल्याने आपण समाजाची काहीतरी सेवा करत आहोत अशी देखील भावना त्यांच्या मनात तयार झाली. यानंतर ते नियमित रक्तदान करू लागले.
'सासरलाही लेक निघाली' ज्योतीला मिळालं हक्काचं नवं कुटुंब, कोल्हापुरात शाही विवाह सोहळा
त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. तेथून त्यांना जनकल्याण रक्तपेढी सुरू करण्याची संकल्पना सुचली. 1999 मध्ये जालना शहरामध्ये जनकल्याण रक्तपेढी त्यांनी सुरू केली. या रक्तपेढीच्या माध्यमातून ते शहरातील गरजूंना रक्तपुरवठा करण्याचेही काम करत आहेत.
रक्तदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर होत आहेत. त्यामुळे तरुण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा समाजासाठी काही करायची इच्छा असून देखील आपण करू शकत नाही. मात्र रक्तदान हे असं दान आहे जे आपण मोफत करू शकतो. त्याचबरोबर जिवंत असताना रक्त ती एकच अशी गोष्ट आहे जी आपण इतरांना देऊ शकतो. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतूनच आपण आतापर्यंत रक्तदान केल्याचं पुसाराम मुंदडा यांनी सांगितलं. तसेच वयाचे 65 वर्षापर्यंत तब्बल 131 वेळा रक्तदान करण्याचा मुंदडा यांचा संकल्प आहे.





