छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श जालना शहराला झाला आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी महाराजांनी जालना शहरातून धन गोळा केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. गिरीश टकले या लेखकाने लिहिलेल्या सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई आणि शिवछत्रपतींची अखेरची जालनापूर मोहीम या पुस्तकांमध्ये या संदर्भात तपशीलवार माहिती मिळते.
APMC Market: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी वाढ, डाळिंबाला काय मिळाला भाव?
advertisement
पुस्तकातील दाव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे चार दिवस जालना शहरात मुक्कामी होते. 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 1679 हा तो कालावधी. जालना शहर तेव्हा जनकपूर या नावाने ओळखले जायचे. स्वतः महाराजांनी शहरात न जाता संरक्षण भिंतीबाहेरच मुक्काम ठोकला असावा. कारण सुरत लुटीत महाराज प्रत्यक्ष सुरत शहरात न जाता त्यापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर थांबले होते. अंबड मार्गे म्हणजे जालन्याच्या दक्षिण दिशेने ते शहराच्या जवळ आले असावेत. प्रत्यक्ष लुटीविषयी स्वतः महाराजांनी त्यांचे बंधू व्यंकोजी राजे यांना लिहिलेल्या पत्रात वर्णन केले आहे.
महाराजांनी पत्रात आपल्या जालना लुटीचा हेतू स्पष्ट केला आहे. दिलेरखानाचे विजापुरावरील दडपण दूर करण्याच्या हेतूने त्यांनी मुघल मुलुखात शिरण्याची आणि फौजा पसरविण्याचे ठरवले. मुघल मुलुख उद्ध्वस्त करीत ते जालनापूरकडे गेले. जालनापूर औरंगाबाद पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. लूट चार दिवस चालली. या लुटीमध्ये सोने, नाणे, रुपे म्हणजे भरपूर चांदी मिळाली. जालना हे विणकामाचे केंद्र असल्याने कापडही बरेच मिळाले होते. तसेच हत्ती, घोडे ही मिळाले. जालनापुरातील लुटीच्या रकमेबाबत स्पष्ट उल्लेख नाही. परंतु ज्याअर्थी लूट चार दिवस चालली त्याअर्थी बरेच घबाड मिळाले असावे, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकामध्ये आहे, असे पत्रकार केसापूरकर यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
यानंतर अवघ्या सहाच महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यामुळे स्वराज्य उभारणीसाठी धन गोळा करण्यासाठी जालना शहराची स्वारी महाराजांची अखेरची ठरली.





