काय होणार परिणाम?
शक्तिपीठ महामार्गांला जोतिबा मंदिर ही जोडणार
कणेरी ते जोतिबा असा नवा जोडरस्ता प्रस्तावित
पश्चिम भागातले शेतकरी हवालदिल
नद्यांच्या भागातून जाणाऱ्या रस्त्याने महापुराचे संकट
नागपूर पासून निघणार शक्तिपीठ महामार्ग थेट गोव्याला जाणार आहे.मात्र आता याच रस्त्याला जोतिबा मंदिर जोडले जाणार असून कणेरी पासून नवा जोड रस्ता त्यासाठी करण्यात येणार आहे.सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता अगदी सुपिक जमिनीतून आणि नद्यांच्या भागातून जाणार आहे.त्यामुळे हा रस्ता तयार झाल्यास शेतीचे धरण होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मरण येणार असल्याचा आरोप करत इथल्या शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे.
advertisement
कसा असेल हा नवा रस्ता?
२८ किलोमीटरच्या हा मार्ग प्रस्तावित आहे.
कणेरी, वडगाव, नंदवाळ, बालिंगा, साबळेवाडी अशी गावे येत आहेत
कासारी आणि भोगावती नद्या याच परिसरातून जात असल्याने इथे दरवर्षी महापूर असतो.
भराव टाकून हा रस्ता होणार असल्याने राधानगरी, करवीर, पन्हाळा या तालुक्यातील शेतीला फटका बसणार आहे. या रस्त्यामुळे त्यात अधिक भर पडणार असून इथली जमीन क्षारपड होण्याची भीती आहे
खरेतर पुणे बंगलोर महामार्गावरून ज्योतिबाला जाता येत असताना हा नवा मार्ग कशासाठी? असा सवाल राजू शेट्टी यांनी करत याला तीव्र विरोध केला आहे. एका बाजूला कोल्हापुरातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. त्यांचा विरोध तीव्र आहे. ज्या भागातून हा मार्ग जातो तिथले शेतकरी पेटून उठले आहेत. असे असताना दुसऱ्या बाजूला मात्र या महामार्गला उपशाखा काढल्या जात असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत.
हा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावरून फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी देत आहेत. एकूणच पाहायला गेले तर विकासाच्या नावाखाली कोल्हापुरात सुपीक शेतीतून रस्त्यांचे जाळे पेरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्यातून होत आहे. आता या रस्त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या महापुराने अगोदर त्रस्त असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची ही हाक सत्ताधाऱ्यांपर्यंत जाणार का हेच पाहणे महत्वाचे असेल.
