कोल्हापूर : एखाद्या छोट्याशा व्यवसायातून उत्पन्न मिळवण्यासाठी त्याला मेहनतीबरोबर इतर गोष्टींची जोड देखील द्यावी लागते. याच आपल्या मेहनतीच्या जोरावर आज कित्येक महिला कोल्हापुरात आपला छोटासा व्यवसाय सांभाळत आहेत. काही जणांचा तर साधाच व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परीसरात चिंचा, आवळे अशा रानमेव्याची विक्री करणाऱ्या शीला नाईक. रानमेव्याच्या विक्रीचा त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असूनही तितक्याच मेहनतीने आजही त्या व्यवसाय करतात.
advertisement
प्रत्येक मंदिराच्या परीसरात अनेक विक्रेते असतात. काहीजण गंध-कुंकूचा व्यवसाय करतात, तर काहीजण खेळणी किंवा दागिन्यांचा व्यवसाय करतात. तर कोणत्याही मंदिराच्या आवारात फळे किंवा खाद्यपदार्थाची विक्री ही हमखास होत असते. त्यामुळेच कोल्हापूरच्या शीला नाईक यांच्या आईच्या आईने चिंच, आवळे, कच्चा आंबा आदी घटक अंबाबाई मंदिराच्या परिसरात विकायला सुरुवात केली होती. सुरुवातीला अगदी काही पैशांना हा रानमेवा भाविकांना चाखायला मिळत असे. अंबाबाई मंदिराच्या परिसरात एका टोपलीसह सुरू केलेला हा व्यवसाय हळूहळू शहरीकरण आणि बदलानुसार आता मंदिराच्या परिसरातच तीन ठिकाणी सुरू केल्याचे शीला सांगतात.
पोहे खावे तर इथंच, तर्रीपासून ते सांभार पोह्यांपर्यत मिळतात तब्बल 9 प्रकार PHOTOS
कशा कशाची करतात विक्री?
शीला या बऱ्याच प्रकारच्या रानमेव्याची विक्री करतात. त्यामध्ये मुख्य म्हणजे चिंच हा घटक असतो. मग त्यामध्ये कच्ची चिंच, चिंचेचा साधा व चटणी मिठाचा गोळा, छोटे आणि मोठे आवळे, आवळ्यापासून बनवलेल्या मोरावळा, आवळा कँडी अशा काही गोष्टी, कच्च्या आंब्याची फोड आदी घटक नियमित मिळतात. कोणत्याही हंगामात या गोष्टी शीला यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसात करवंद, जांभूळ, कच्चे आंबे, इलायची चिंच, नेर्ली आदी घटक देखील त्यांच्याकडे मिळत असतात.
कुठून आणला जातो हा रानमेवा?
सुरुवातीपासूनच हा रानमेवा कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरून देखील मागवला जातो. हंगाम असो अगर नसो हा रानमेवा विक्रीसाठी उपलब्ध असतो. यामध्ये चिंच, आवळे हे खेड्यापाड्यातून विकत घेतले जातात. तर इतर काही घटक कोकणभागासह पुण्यातून देखील मागवले जातात. तर कच्ची कैरी आणि आवळा बेंगलोरवरून मागवली जाते. हंगामी काळात हे रानमेव्याचे घटक सहसा गगनबावडा, गडहिंग्लज भागातून मिळतात.
Bangalore मधली नोकरी सोडली अन् घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या तरुणाची अनोखी गोष्ट
सध्या शीला यांचे कुटुंब तीन ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय करत आहे. एके ठिकाणी त्यांचा मुलगा, दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या जाऊबाई आणि तिसऱ्या ठिकाणी त्या स्वतः हा व्यवसाय करतात. मात्र आज त्यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असली तरी रोजच्या कष्टाला त्यांना पर्याय नाही आहे. त्यामुळेच सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत शीला आणि त्यांचे कुटुंब हा चिंच, आवळे विक्रीचा व्यवसाय अंबाबाई मंदिर परिसरात करत असतात.