सातारा : अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. बच्चू कडू तोडीबाज, वसुलीबाज आहेत, ते सुपारी घ्यायचं काम करतात. मातोश्रीहून त्यांना रसद पोहोचवली गेली, असा आरोप रवी राणा यांनी केला. रवी राणा यांच्या या आरोपांना बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दोन वर्षांपासून ते सातत्याने आरोप करत आहेत, त्यांच्या आरोपाला आता कोर्टात उत्तर देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
advertisement
'नवनीत राणा सतत टीव्हीवर दिसायच्या त्यामुळे राणा जरा दबून गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे, त्यामुळे स्वाभिमान पार्टीनेच भाजपच्या नवनीत राणांना पाडलं', असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
'राज्यात भाजपचं सरकार आलं नाही तर स्वाभिमान पार्टी पुन्हा आघाडीबरोबर जाऊन बसेल. गेल्यावेळी राणा निवडून आल्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आणि फ्लाईटमध्ये बसल्या. उतरल्याबरोबर मोदींच्या जवळ गेले. मानसिक संतुलन बिघडलं आहे. पराभव पचवता आला नाही. बायको भाजपमध्ये आणि हे स्वाभिमानमध्ये त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाला. उठसुट मला बोललं की त्याचा मोठा नेता खूश होतो, त्यासाठी हे सगळं करत राहतो', असा पलटवार बच्चू कडू यांनी केला आहे.