2019 नंतर राज्यातील राजकारणात मोठे उलटफेर झाले आहेत, त्यामुळे एका कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांचं काम करत असल्याचं दिसून आलंय. राजकारणात नात्या गोत्यापेक्षा पक्ष हा महत्त्वाचा असतो असं मत शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय, त्यामुळे खडसेंनी एकप्रकारे रावेर मतदासंघातून सून रक्षा खडसेंविरोधात लढण्याचेच संकेत दिल्याची चर्चा आहे.
advertisement
खडसेंच्या या इशाऱ्यानंतर भाजपनंही जोरदार पलटवार केला आहे. '40 वर्षात पक्षाने आपल्याला सर्व पदं दिली पण त्यांना पक्ष समजला नाही. रक्षा खडसेंना पक्ष समजला. आज मात्र त्यांना नात्यागोत्यापेक्षा पक्ष श्रेष्ठ वाटतोय. समोरून कुणीही आलं तरी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ', असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी दिलं आहे.
एकनाथ खडसे पक्ष सांगेल ती निवडणूक लढण्याची तयारी दर्शवत असले, तरी खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं मात्र सासरे आणि सुनेची लढत होण्याची शक्यता फेटाळली आहे. मध्यंतरी खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण, खडसेंनी मात्र ही चर्चा पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचं सांगत, खडसेंनी नव्या आव्हानाचा सामना करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे आता खडसेंच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजप पुन्हा रक्षा खडसेंना मैदानात उतरवते का उमेदवार बदलत खडसेंना पुन्हा घेरते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
