काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
'कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आम्ही पक्ष म्हणून आणि आयडोलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर अशी भूमिका घेत असतो. शाहू महाराजांची विचारसरणी आणि चळवळीच्या जवळचं कुटुंब मानतो. पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने केले जातील. मागे जे घडलं होतं ते या वेळेस न घडू देणं याची दक्षताही त्याठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे', असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
advertisement
महाविकासआघाडीला अल्टिमेटम
'महाविकासआघाडीचा तिढा त्यांनाच विचारा, आम्हाला काहीही माहिती नाही. प्रकाश शेंडगेंनी नवीन पक्ष रजिस्टर केला आहे, त्यांनी एक लिस्ट सादर केली आहे. आमचंच घोंगडं भिजत पडलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही तुमच्याशी बोलू शकत नाही, असं आम्ही त्यांना सांगितलं', असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर म्हणाले.
'तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असतं तर हे घोंगडं भिजत राहिलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला टार्गेट केलं त्यामुळे त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आवाज द्यायला लागलं आहे, की 10 जागांवर सेना आणि काँग्रेसमध्ये टाय आहे. 5 जागांवर सेना, एनसीपी काँग्रेस यांच्यात टाय आहे, पण सगळं टार्गेट वंचित होतं. त्यांचाच तिढा सुटत नसेल तर आम्ही त्यांच्यात कुठे शिरायचं. त्यांचा तिढा सुटलाय असं आम्हाला कम्युनिकेट झालेलं नाही. त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमच्या एण्ट्रीने काय उपयोग आहे. 26 तारखेपर्यंत थांबणार, नाहीतर आम्ही उमेदवार देणार. आमच्या मदतीने काँग्रेस जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी कळवाव्यात', असं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीला दिलं आहे.
