एका जमिनीच्या वादातून परळी येथील व्यावसायिक महादेव मुंडे यांना आरोपींनी धमकी दिली होती. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी दबाव आणला परंतु मुंडे यांनी व्यवहार करण्यास नकार दिल्याने मारेकऱ्यांनी मुंडे यांना संपवले. महादेव मुंडे यांच्या हत्येला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आली तरीही अजून मारेकरी जेरबंद झालेले नसल्याने मुंडे कुटुंबीय हतबल आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पावसाळी अधिवेशनात महादेव मुंडे यांच्या हत्येवरून सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) घोषणा केली. गेल्या आठवड्यात मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.
advertisement
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास विशेष पोलीस पथकाकडे वर्ग, बीड पोलिसांची घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी बीडला येऊन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांची भेट घेतली. यावेळी बीड पोलिसांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास विशेष पोलीस पथकाकडे वर्ग केला, अशी घोषणा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी माध्यमांना केली.
पंकज कुमावत हे बीड आणि परळीत तळ ठोकून असणार
विशेष पोलीस पथकाने सूत्रे हातात घेतल्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील घडामोडींना वेग आलेला आहे. चौकशी पथकाचे प्रमुख पंकज कुमावत हे बीड आणि परळीत तळ ठोकून असणार आहेत. आजापर्यंतची कुमावत यांची कारकीर्द पाहता राजकीय दबाव झुगारून मुंडे हत्या प्रकरणाचा ते छडा लावतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.