मुंबई : काही महिन्यांपूर्वीच राज्यातील वीज दरात कपात झाली असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, ऐन दिवाळीच्या आधीच राज्यातील वीज ग्राहकांच्या खिशावरील भार वाढणार आहे. महावितरणने राज्यातील वीज दर वाढवले आहेत.
राज्यातील वीजग्राहकांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर चिंताजनक बातमी समोर आली आहे. महावितरणने इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात वीज दरवाढ जाहीर केली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्वच स्तरातील ग्राहकांना या वाढीचा फटका बसणार आहे.
advertisement
महावितरणने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सप्टेंबर महिन्यातील वीज वापरावर ही वाढ लागू करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत हा दर कायम राहणार आहे. या निर्णयानुसार ग्राहकांना प्रति युनिट ३५ पैसे ते ९५ पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.
महावितरणच्या माहितीनुसार, वीज मागणीत वाढ झाल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली तसेच जास्त उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. त्यामुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
या दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रालाही वीज बिलाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. राज्यभरातील लाखो ग्राहकांना दिवाळीपूर्वीच “वीज शॉक” बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.
>> महावितरणने केलेली नवी दर वाढ (प्रति युनिट दर):
> १ ते १०० युनिट्स – ३५ पैसे
> १०१ ते ३०० युनिट्स – ६५ पैसे
> ३०१ ते ५०० युनिट्स – ८५ पैसे
> ५०१ युनिट्सपेक्षा अधिक वापरावर – ९५ पैसे