मनोज जरांगे पाटलांनी आजपासून बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी जरांगे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही, त्यांना खडेबोल सुनावत त्यांनीच पचका करून ठेवला आहे. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका, त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही,असे जरांगे यांनी सांगितले आहे.
advertisement
निवडणुकीतून माघार का घेतली?
जरांगेंनी यावेळी निवडणुकीतून माघार घेण्याचेही कारण सांगितले आहे. मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते, मात्र त्यांच्यासाठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत, मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते टोमणे मिळाले असते, त्यामुळे माझी समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली, असे जरांगेंनी स्पष्ट केले.
आज पासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं, राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानलं आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे.कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
