मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईतील आंदोलनात राज्य सरकारने तीन गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर सहमती दर्शवली होती. मुंबईतील आंदोलनानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सरकारने जीआर काढला आहे, आता अंमलबजावणी देखील करा असेही त्यांनी म्हटले.
advertisement
जरागेंची सरकारला डेडलाइन...
मनोज जरांगे यांनी 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली पाहिजे अशी मागणी करत डेडलाइन दिली आहे. जीआर काढला आहे तर त्याची अंमलबजावणी करा आणि नोंदी सापडल्यांना लवकर प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा अशी मागणी त्यांनी केली. सरकारने यामध्ये आता बदल करू नये. 17 सप्टेंबर पर्यंत प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे, नाहीतर मला पुन्हा नाईलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटले. नोंदी सापडल्यावर जर प्रमाणपत्र द्यायला सुरुवात नाही झाली तर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाच्यावतीने बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील निर्णायक टप्प्यानंतर हा दसरा मेळावा होत असल्याने सगळ्यांचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.
मराठवाड्यातील 100 टक्के मराठा ओबीसीमध्ये...
मनोज जरांगे यांनी सांगितले की, 100 टक्के मराठ्यांना प्रमाणपत्र मिळणार याची मला गॅरंटी आहे. आपला विजय खूप लोकांना पचत नाही. काही लोक आता प्रश्न उपस्थित करत आहेत. शब्द चुकला काही झाले तर ते दुरुस्त करण्याचे काम सरकारचे आहे आमचे नाही असेही जरांगे यांनी म्हटले.
नोंद नसलेल्या मराठ्यांना सुद्धा गॅझेट नुसार प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि ते द्यायला सुरुवात करा अशी मागणी त्यांनी केली. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले जाणार नसल्याचे कोणीही म्हणत असले तरी आता या नोंदीनुसार आता मराठवाड्यातील सगळा मराठा समाज आता ओबीसीत जाणार असल्याचा दावा जरांगे यांनी दिला.