मुंबई: मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अन्न-पाण्याची, पावसाची तमा न बाळगता लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अत्यंत चिवटपणे आरक्षणाच्या मु्द्यावर आंदोलन सुरू आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षणावर भाष्य करणारे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना मनोज जरांगे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
advertisement
पंढरपूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे असल्याचे त्यांनी म्हटले. कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांची ही मागणी आंदोलनातील कळीचा मुद्दा ठरला आहे. याच मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले. मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना काही समजत नाही. चंद्रकांत पाटील यांनी शांत रहावे, मराठ्यांच्या शिव्या खावू नये. समाजाबद्दल चुकीचे बोलले तर त्यांचा गेमच वाजवेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. ओबीसी आहोत ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. ओबीसीमधून आरक्षण देण्यास मी खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठ्यांचे खरं आरक्षण EWS ...
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी असलेले EWS आरक्षण हे खरे मराठ्यांचे आरक्षण आहे. मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. जात मागास ठरवण्याचे अधिकार घटनेने केवळ मागासवर्गीय आयोगाला दिलेले आहेत, ते शिंदे समिती ठरवू शकत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.