अशात सरकारने एकीकडे आंदोलनासाठी जागा उपलब्ध केली असली तरी पडद्याआडून आंदोलकांची अडचण निर्माण करत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आंदोलनाला या ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करून हा आरोप केला आहे.
advertisement
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, सरकारने आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात. हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात.
तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा, असं रोहित पवार म्हणाले.
