मिरा भाईंदरमध्ये अमराठी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मराठी माणसाची गळचेपी होत असल्याच्या अनेक तक्रारी येथून मागेही आल्या. मराठी बोलणारच नाही, मराठी शिकणारच नाही, अशी मग्रुरी तेथील अमराठी व्यापाऱ्यांनी दाखवली. त्याच मिरा भाईंदरला जाऊन मराठीचा जयघोष करण्याकरिता मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा किंवा रॅली काढण्याची पक्ष पातळीवर रणनीती सुरू असल्याचे कळते.
advertisement
जिथे व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला तिथेच राज ठाकरेंचा एल्गार
राज ठाकरे १८ जुलै रोजी मिरारोड येथे जातील. मिरा रोड येथेच मोठी सभा घेऊन मराठी मोर्चा आणि घडलेल्या प्रकारावर राज ठाकरे बोलतील. मराठी मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आयुक्त आणि त्यानंकर मराठीच्या रेट्यापुढे प्रकरण अंगलट आल्यानंतर शासनाने नमते घेऊन परवानगी द्यायला लावल्याच्या घटनेवर राज ठाकरे खास ठाकरी शैलीत भाष्य करतील, असे कळते. घडलेल्या सगळ्या प्रकारावर सभेच्या माध्यमातून बोलण्याचे राज ठाकरे यांचे नियोजन आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत हिंदीसक्तीच्या विरोधात मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे एकत्र आले. ५ जुलै रोजी वरळीतील कार्यक्रमात मराठीसाठी सगळे वाद बाजूला ठेवण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी बोलून दाखवला. त्यानंतर मिरा रोड मोर्चा प्रकरण घडल्याने तापत्या वातावरणात महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरे मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणून मराठी मतांचे एकत्रिकरण करतील, असे राजकीय जाणकार सांगतात.