मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या आक्रमक भाषेत निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. याच आरोपाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचा त्यांनी जोरदार समाचारही घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. स्थानिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू असून मतदारयादीत बनावट मतदार घुसवले जाताहेत, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं केला. जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
advertisement
निवडणूक आयोग आणि मतदारयाद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे आगामी निवडणुका कधी होतील, यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. राजकीय पक्षांचे समाधान होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक लावू नये अर्थात आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल, असे राज म्हणाले.
चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांना काय अर्थ आहे? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. अशा प्रकारे होणाऱ्या निवडणुका हा मतदारांचा अपमान असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. तसेच निवडणूक आयोगावर टीका केल्यावर सत्ताधारी का चिडतात? या बाबत राज ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं.
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिकांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. सुप्रीम कोर्टानं त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मात्र राज ठाकरेंनी मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असा आक्रमक पवित्रा घेतलाय. परिणामी अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मतदारयाद्या कधीपर्यंत दुरूस्त होतील, विरोधकांचं मतदारयाद्यांवर समाधान कधी होईल आणि मग कधी निवडणुका होतील, अशी प्रश्नांची मालिकाच आता निर्माण झालीय. या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तो पर्यंत राजकीय गोंधळ सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय.
