मतदारयाद्यातील घोळाविरोधात काढण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंच्या एकीचं दर्शन झालं. चर्चगेटच्या फॅशन स्ट्रिटपासून निघालेल्या या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र चालत असल्याचं चित्र अनेक वर्षानंतर दिसून आलं. मोर्चात मार्गाक्रमण करत असतानाच राज आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी संवादही साधला होता. सत्याच्या मोर्चात स्टेजवरही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेही एकत्र बसले होते. याच मोर्चावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी एकत्र आलोय साथ द्या, असे आवाहन केलंय.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळं मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या युतीची चर्चा सुरू झालीय. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या
या वक्तव्यामुळं मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या युतीचे संकेत मिळताहेत. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी मतदारयाद्याच्या घोळाविरोधात एल्गार पुकारलाय.
पैठणचा सत्ताधारी पक्षातील भुमरे नावाचा आमदार सांगतो की मी २० हजार मतदार बाहेरून आणले. मतदारयादीवर काम करावे, लागेल असे तो स्वत: सांगतो. नवी मुंबईच्या आयुक्तांच्या पत्त्यावर १३० लोक नोंदवले गेले. परवा मी ईव्हीएमबद्दल बोललो. मतदान यंत्राबद्दलची प्रात्याक्षिके दाखवले. उदाहरणच सांगायचे झाले तर २३२ आमदार निवडून आल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा होता. नेते चिमटे काढून बघत होते की खरंच आपण निवडून आलोय का...? सगळे मतदार गोंधळले होते. सगळीकडे शांतता होती, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या बाजूला बसलेले दिसून आले. तर उद्वव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच राज ठाकरे हे शरद पवारांच्या बाजूला बसले होते. शरद पवारांनी महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल, असे पवार म्हणाले.
सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांच्या एकीचं दर्शन घडलंय. ठाकरे बंधूंच्या एकीही यावेळी पाहायला मिळाली. आगामी काळात ठाकरेंचा पक्ष आणि मनसेची युतीचे संकेत या सत्याच्या मोर्चातून मिळताहेत.
