सोलापूर: राज्यात महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला यश आलं आहे. भाजपचे ४४ नगरसेवक राज्यभरात बिनविरोध निवडून आले आहे. पण सोलापूर महापालिका निवडणुकीत बिनविरोध करण्याच्या वादातून मनसेचा पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.ल भाजपच्या दोन गटात झालेल्या वादात 'समाज आपला एक आहे, भांडण कशाला करता, एकमेकांना समजून घ्या' अशी समजूत काढण्यासाठी गेलेले बाळासाहेब सरवदे यांची चाकूने भोसकून खून करण्यात आला, असा आरोप मनसेनं केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये दुपारी ही घटना घडली. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे शहरअध्यक्ष होते. सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या दोन गटात वाद झाला होता. प्रभाग २ मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्याच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे या मयत बाळासाहेब सरवदे यांच्या भावजायी आहे.
'बाळासाहेब सरवदे यांच्या पोटात चाकू खुपसला'
'शंकर शिंदे, बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनिल शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे हे आमच्याा घरी आले होते. त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या पोटात चाकू खुपसला. आमच्या एका भावाला कोयत्याचा वार लागला आहे. तो रुग्णालयात दाखल आहे. आमचा भाऊ वाचला असता. पण रुग्णालयात आमच्या भावाला वेळेवर उपचार केला नाही, असा आरोप बाळासाहेब सरवदे यांच्या भावाने केला आहे.
'बाळासाहेब सरवदे यांचा काही संबंध नव्हता'
मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी सांगितलं की, "भाजपचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख हे निवडणुकीला उभे आहे. आपल्या मुलाला बिनविरोध आणण्यासाठी दबावतंत्र सुरू होतं. भाजपमध्ये त्यांचा त्यांचा वाद झाला होता. बाळासाहेब सरवदे यांचा काही संबंध नव्हता. तो मनसे पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा शहर अध्यक्ष होता. दुपारी देशमुख आणि शिंदे यांच्यामध्ये काही तरी वाद झाला. त्यानंतर सरवदे यांनी अर्ज मागे घेतला होता. रेखा सरवदे या बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत भावाची बायको आहे. आपल्या भावजायीला असं काय केलं, त्यामुळे बाळासाहेब सरवदे हा शंकर शिंदे यांच्या घरी गेला होता."
बाळासाहेब सरवदे जेव्हा त्यांच्या घरी गेला, तेव्हा शंकर शिंदे यांचा मुलगा आणि जावई होता. त्यांनी बाळासाहेब सरवदे यांना घेराव घातला, त्यावेळी या शिंदेंना फोन आला, किरण देशमुख यांचा फोन आला. या सगळ्यांनी जागेवरच बाळासाहेब सरवदे यांच्या पोटाच चाकू खुपसून खून केला. या महाराष्ट्रात या सोलापुरात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपला आहे का, आपला उमेदवार बिनविरोध करण्यासाठी हा प्रकार केला. माझी मुलगी सुद्धा निवडणुकीला उभी आहे. पण भाजपच्या नेते अजित गायकवाड, नरेंद्र काळे यांनी मला ५ ते ६ वेळा फोन केले. यांनी मला दबाव टाकून मनसेची उमेदवारी मागे घ्या, असा दबाव टाकत होते' असा आरोपही इंगळेंनी केला.
'समाज आपला एक आहे, भांडण कशाला करता'
तसंच, "बाळासाहेब सरवदे हा फक्त त्यांना विचारायला गेला होता, असं का केलं, समाज आपला एक आहे, भांडण कशाला करता, एकमेकांना समजून घ्या, असं सांगितलं. पण शंकर शिंदे, शरद शिंदे आणि त्यांची मुलं आहे, त्यांनी बाजीराव सरवदे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यावर हल्ला केलाा. यात बाजीराव सरवदे यांना मुक्का मार लागला आहे. त्यांचा चुलत भाऊ आदित्य सरवदे जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयाात उपचार सुरू आहे.
'भाजप आमदार विजय देशमुख सगळ्याला जबाबदार'
आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याासाठी बाळासाहेब सरवदे यांचा बळी गेला आहे. भाजपचे आमदार विजय देशमुख यांची आमदारकी रद्द केली पाहिजे, किरण देशमुखला बेड्या ठोकल्या पाहिजे. शंकर शिंदे, बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनिल शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे या सगळ्यांनी मिळून सरवदेंचा खून केला आहे. या घटनेला भाजप आमदार विजय देशमुख आणि त्यांचा मुलगा किरण देशमुख जबाबदार आहे, असा आरोपही इंगळेंनी केला.
