नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते मंत्री नरहरी झिरवाळ यांनी खूप प्रयत्न केले. परंतु अजित पवार यांच्याकडून झिरवाळ यांना कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या हिंगोलीच्या पालकत्वाची जबाबदारी दिली गेली.
झिरवाळ नाराज म्हणाले, मी गरीब असल्यानेच...
मी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले, असे वक्तव्य करून नरहरी झिरवाळ यांनी पालकमंत्रिपदाबाबत खदखद व्यक्त केली. जिथे एमआयडीसी नाही, अशा जिल्ह्याचे नाव हिंगोली, अशा हिंगोलीचे पालकत्व माझ्याकडे दिले, मी गरीब असल्यानेच गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले, असे झिरवाळ म्हणाले.
advertisement
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सोपविलेली जबाबदारी आनंदाने पार पाडेन पण माझ्यावर हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी का दिली, हे मात्र मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जरुर विचारणार आहे, असे झिरवाळ म्हणाले.
नाशिक रायगडवरून कलगीतुरा
रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत असंतोष उफाळून आल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की ओढावली. नाशिक पालकमंत्री पदाबाबत संघ परिवार गिरीश महाजनांच्या पाठीशी ठामपणे आहे. कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर हक्काचा पालकमंत्री हवा, यात कसलीही तडजोड नको, असा संदेश संघ परिवाराकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्या पक्षाला मिळावे, असे जाहीरपणे एकनाथ शिंदे म्हणाल्याने गोगावले समर्थकही आक्रमकपणे तटकरे यांना बोल लावत आहेत.