नाशिक जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याचे वातावरण 32 डिग्री सेल्सियस ते 35 डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर लागत असून जल साठ्यातलं पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होऊ लागलं आहे. यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्या आत्तापासूनच भेडसावत आहे. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाण्याचा साठा केला जातो. या गंगापूर धरणात सध्या 59.11 टक्के इतका पाण्याचा साठा आहे. जिल्ह्यातल्या आणि शहरातील वेगवेगळ्या जल साठ्यात दिवसेंदिवस फरक पडत आहे. त्यामुळे जरीही आत्ताच उन्हाळा सुरू झाला असला तरीही नागरिकांना महापालिकेकडून पाण्याची बचत करण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
कोणत्या धरणामध्ये किती टक्के साठा?
गंगापूर धरणात 59.11 टक्के पाणी साठा, काश्यपी धरणात 84.18 टक्के पाणी साठा, गौतमी धरणात 86.03 टक्के पाणी साठा, आळंदी धरणात 48.65 टक्के पाणी साठा, पालखेड धरणात 57.89 टक्के पाणी साठा, करंजवण धरणात 57.85 टक्के पाणी साठा, वाघाड धरणात 38.18 टक्के पाणी साठा, ओझरखेड धरणात 70.42 टक्के पाणी साठा, दारणा धरणात 56.65 टक्के पाणी साठा, भावली धरणात 50.07 टक्के पाणी साठा, मुकणे धरणात 64.97 टक्के पाणी साठा, वालदेवी धरणात 81.20 टक्के पाणी साठा, कडवा धरणात 36.79 टक्के पाणी साठा, चणकापूर धरणाक 57.77 टक्के पाणी साठा, हरणबारी धरणात 62.26 टक्के पाणी साठा आणि केळझर धरणात 62.59 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
अनेक धरणातला पाणीसाठी फार कमी असल्यामुळे त्या भागातील नागरिकांना फार लवकरच पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यापासूनच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी टँकरची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची वाढती मागणी आणि पाण्याचे होणारे बाष्पीभवन पाहता टँकरच्या मागणीत वाढ होऊ शकते. दरवर्षी मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरची समस्या निर्माण होते. पण गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे यंदाचा उन्हाळा जरा कमी चिंतेत जात आहे.
