नाशिक, 31 ऑगस्ट : काही वर्षांपूर्वी मराठीत मुळशी पॅटर्न चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. मसल पॉवरच्या जीवावर जमिनी बळकावल्या जात असल्याचं कथानक या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. असाच फिल्मी स्टाईल प्रकार येवल्यात घडल्याने खळबळ उडाली होती. जीवे मारण्याची धमकी देऊन जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 4 आरोपींना अटक केली असून 13 आरोपी फरार आहेत. या गुंडाची दहशत कमी करण्यासाठी त्याच परिसरातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बनावट दस्तऐवज तयार करून जबरदस्तीने जमिनी बळकवण्याचे दृश्य आपण मुळशी पॅटर्न चित्रपटात पाहिले असेल. अशीच घटना येवल्यातही घडली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करून टोळीतील 17 पैकी 4 आरोपीच्या मुसक्या आवळ्या असून मुख्य आरोपीसह 13 आरोपी फरार आहेत. फरार आरोपींमध्ये जमीन खरेदी विक्रीचे दस्त तयार करणारे दलाल, त्याची नोंद करणारे अधिकारी यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींची शहरात दहशत होती. त्यामुळे नागरिक घाबरत होते. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची थेट धिंडचं काढली. फरार आरोपी बाबत धागेदोरे लागले असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
नाशिक शहरात गुंडागर्दी वाढली?
नाशिक शहरात मागील काही दिवसात जणू हत्यासत्रच सुरू होतं. आठवड्यात तीन हत्या झाल्या त्याही भरदिवसा. या घटनानंतर शहरात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात यंदा गुन्हेगारी कमी झाल्याचं आकडेवारी सांगत आहे. नाशिक शहरात मागील 7 वर्षांत खून, वाहनांची जाळपोळ, तोडफोडीसह दाखल वेगवेगळ्या एकूण गुन्ह्यांची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी झाले असून दुसरीकडे दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसत आहे.
वाचा - पठ्ठ्या 50 हजार ऑनलाईन रमीत हारला अन् दिली चोरीची तक्रार, पोलिसांनी घडवली अद्दल
या वर्षात आतापर्यंत एकूण 2713 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 1569 म्हणजे जवळपास 60 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले. यामध्ये खूनाच्या 27 पैकी 26 आणि वाहनांची जाळपोळ, तोडफोडीच्या 15 पैकी 14 गुन्ह्यांचाही समावेश आहे. चालू वर्षात पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईवर भर दिल्याने आतापर्यंत चौघांवर मोक्का, नऊजणांवर एमपीडीएची कारवाई झाली. तब्बल 12 हजार 447 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.