राज्य सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या नियमांनुसार दोन वर्षांखालील बालकांना कोणतेही कफ सिरप किंवा सर्दीवरची औषधे देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ऐवढेच नाही तर पाच वर्षांखालील मुलांसाठीही अशी औषधे देणे सामान्यतः शिफारस केलेले नाही कारण या वयोगटातील बहुतांश सर्दी-खोकल्याचे आजार औषधांशिवाय नैसर्गिकरीत्या बरे होतात.
advertisement
राज्य सरकारने सांगितले की लहान मुलांमध्ये सर्दी आणि कफचे बहुतांश आजार नैसर्गिकरीत्या बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही. त्यामुळे पालकांनी औषधे न देता घरगुती आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करावा. उदा. पुरेसे पाणी पिणे, मुलांना पुरेशी विश्रांती देणे आणि हवामानानुसार कपडे वापरणे.
जर औषध देणे अत्यावश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे देऊ नयेत असा कठोर इशारा राज्य सरकारने दिला आहे. डॉक्टरांनी मुलाची तपासणी करूनच औषध देण्याचा निर्णय घ्यावा. तसेच दिलेल्या डोसचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्वतःहून डोस वाढवणे, औषधे मिसळून देणे किंवा जुनी औषधे वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांना केवळ GMP (Good Manufacturing Practice) मानकांनुसार तयार केलेली आणि अधिकृत दर्जाची औषधे वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा औषधांचा वापर केल्यासच मुलांच्या आरोग्याची सुरक्षितता राखली जाऊ शकते.
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, औषध वितरण केंद्रे, खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संस्था यांचा समावेश आहे.
या सूचनेमुळे अनेक पालक आणि बालरोग तज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण भारतात लहान मुलांना सर्दी-खोकल्यासाठी सहज कफ सिरप देण्याची प्रथा आहे. पण आता या नव्या सूचनांनंतर पालकांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चुकीच्या औषधोपचारामुळे लहान मुलांच्या श्वसनावर आणि मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच राज्य सरकाने हा निर्णय घेतला असून लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे. पालकांनी मुलांना औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि नैसर्गिक उपचारांना प्राधान्य देणे हेच सर्वात सुरक्षित पाऊल आहे.