मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून फलटणच्या डॉक्टर युवतीने जीवन संपविल्याच्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी नवनवे दावे करून खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन तरुणीच्या हातावरील संदेश नेमका कुणी लिहिला, असा प्रश्न विचारीत हस्ताक्षर जुळत नसल्याकडे प्रकर्षाने लक्ष वेधले. आरोपींची चौकशी करायची सोडून त्यांना क्लिनचिट देण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी महिला आयोग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न केल्याची टीकाही अंधारे यांनी केली.
advertisement
ते स्टेटस डॉक्टरने रात्री ११ वाजून सहा मिनिटांनी कसे लाईक केले?
डॉक्टर तरुणीचा सात वाजता मृत्यू झाल्याचे पोलिसांनी कुटुंबियांना फोनवरून कळवले. परंतु तिच्याच फोनवरून तिच्याच बहिणीच्या व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून ते लाईक करण्यात आले, ते स्टेटस कुणी पाहिले? कुणी लाईक केले? असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. तसेच डॉक्टर तरुणीचा मृत्यू सात वाजता झाला असेल तर मग तिचा व्हॉट्सअॅप लास्ट सीन रात्री ११ नंतरचे कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारले.
डॉक्टर तरुणीच्या हातावर दुसऱ्या कुणी लिहिले का?
डॉक्टर तरुणीच्या हातावर दुसऱ्या कुणी लिहिले का? लिहिले असेल तर तो कोण आहे? जर तो पोलीस सेवेतील माणूस असेल तर या प्रकरणात निष्पक्ष चौकशी कशी होईल? त्यामुळे या प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करा, अशी मागणी अंधारे यांनी केली.
त्या डिटेल्स चाकणकर यांच्याकडे कशा? सुषमा अंधारे यांच्या आरोपांच्या फैरी
घटना घडल्यावर तिथल्या वस्तू पोलीस जप्त करत असतात. वस्तूंची माहिती प्रचंड गोपनीय असते. त्या वस्तू किंवा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने उघडायचा असतो. असे असताना मुलीच्या मोबाईलमधून कुणाशी चॅट होत होते, याची माहिती बाहेर आली कशी? तिचे कॉल रेकॉर्ड्स आणि डिटेल्स रुपाली चाकणकर यांना कसे मिळाले? पोलिसांनी द्यायची माहिती चाकणकर यांनी का दिला? त्यांना तो अधिकार कुणी दिला? अशा आरोपांच्या फैरी सुषमा अंधारे यांनी दिल्या.
