उद्घाटनानंतर अवघ्या २० दिवसांत खड्डे भरण्याची नामुष्की
समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या महामार्गावर इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर तालुक्याच्या हद्दीत अवघ्या २० दिवसात आमणे ते इगतपुरी तसेच इगतपुरी ते आमणे या दोन्ही मार्गिकेवर खड्डे पडले आहेत.
advertisement
इगतपुरी ते आमणे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किमीचा टप्पा ११८२ करोड रुपये खर्च केल्यानंतर अवघ्या २० दिवसांत पडलेले खड्डे बुजवण्याची नामुष्की रस्ते विकास प्राधिकरणांवर आली आहे. शहापूर तालुक्यात रस्ते भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गावर वाहनाचा वेग हा प्रतितास ८०, १०० ते १२० दरम्यान असतो. अपघातांना आमंत्रण देणारे खड्डे, उद्घाटनाच्या २० दिवसांत जर पडत असतील तर ते कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे.
२० दिवसांपूर्वी समृद्धीच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन
नागपूर– मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण ५ जून रोजी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण झाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते.
'समृद्धी'त भ्रष्टाचार, काँग्रेसची आक्रमक भूमिका
देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
