हा घोटाळा बाहेर आल्यानंतर शीतल तेजवाणीला ३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता पार्थ पवारांना देखील कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर, सध्या पार्थ पवारांचे लहान बंधू जय पवार यांचा विवाह सोहळा परदेशात बहरीनमध्ये पार पडत आहे. त्यामुळे सगळं कुटुंब लग्नात व्यस्त आहे. अशात शीतल तेजवाणीला अटक झाल्याने पार्थ पवारांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.
advertisement
पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटी रुपयांची जमीन फक्त ३०० - कोटींत खरेदी केली होती. त्यासाठी मुद्रांक शुल्काचे ६ कोटी रुपयेही भरले नाहीत. त्यामुळे पार्थ पवारांच्या अटकेचा नंबर कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. दीड महिन्यापूर्वी हा घोटाळा उघड झाला. प्रचंड गदारोळ झाल्यावर हा खरेदी करार रद्द केल्याची घोषणा अजित पवारांनी केली. मात्र, अजूनही पार्थ यांनी २१ कोटी रुपयांचा भरणा केलेला नाही. शीतलवर ७ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता.
पार्थ पवारांना अटक का होऊ शकते?
पार्थ पवार हे अमेडिया कंपनीचे मुख्य प्रवर्तक आहेत. तसेच जमीन खरेदी प्रकरणातील इरादापत्रावर त्यांची सही देखील आहे. त्यामुळे ते या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून सामील आहेत की नाही, याचा तपास पोलिसांना करावा लागेल. जर त्यांना व्यवहारातील गैरव्यवहाराची माहिती होती, किंवा त्यांनी यास परवानगी दिली असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले तर त्यांच्यावरही कट रचण्याचा गुन्हा भारतीय न्याय संस्थेच्या कलम ३३६ (४) नुसार दाखल होऊ शकतो. इरादापत्रावर त्यांची सही आणि कंपनीचे मुख्य प्रवर्तक असणे, हे 'कट' सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आधार ठरतील.
