पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. राज्य सरकारकडून तेथे भूसंपादन सुरू आहे. या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार संघर्षही झाला. याच पार्श्वभूमीवर तेथील शेतकऱ्यांनी आज शरद पवार यांची पुण्यातील मोदीबागेत भेट घेतली.
पुरंदरचे ग्रामस्थ आणि शेतकरी शरद पवारांच्या भेटीला
advertisement
आज दुपारच्या वेळी पुरंदरमधील शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगितल्या. पुरंदर विमानतळाबाबतची भूमिका स्पष्ट करताना आपला विरोध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आमचा विरोध असतानाही सरकार भूसंपादन करीत असल्याचे शेतकऱ्यांनी पवार यांना सांगितले.
शरद पवार यांनी तत्काळ फडणवीस-अजितदादांना फोन केला!
त्यावर सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढचा मार्ग काढला पाहिजे, अशी आशा व्यक्त करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. शेतकऱ्यांच्या म्हणणे त्यांनी अजित पवार यांच्या कानावर टाकून चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनाही बोलण्याचा शरद पवार यांनी प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्री एका बैठकीत व्यग्र असल्याने पवार यांचे बोलणे होऊ शकले नाही. सरतेशेवटी पुरंदर विमानतळाच्या अनुषंगाने मी आपली बाजू सरकारसमोर मांडेन, असे पवार यांनी भेटायला आलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
पुरंदर विमानतळ-शेतकरी आणि प्रशासनामध्ये संघर्ष
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतक कुंभारवळण येथील स्थानिक नागरिकांनी भूसंपादनाला विरोध केला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात शेतकरी जखमी झाले होते.
पुरंदर विमानतळ-सरकारची भूमिका काय
पुरंदर येथे विमानतळ होणारच आहे. याबाबत राज्य सरकारची भूमिका बदलणार नाही. विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांनीच राज्य सरकारशी चर्चा करावी, अशी भूमिका महसूलमंत्री बावनकुळे यांनी मांडली होती. तसेच सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. सरकारची चर्चेचीच भूमिका असून चर्चेद्वारेच यातून मार्ग निघू शकतो, असे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.