जालना : यंदा आषाढी एकादशी आहे 17 जुलै रोजी. यानिमित्तानं पंढरपूरला लाखो वारकरी आणि भाविकांची मांदियाळी असेल. सध्या श्री संत महाराजांच्या पालख्यांसंगे वारकरी आणि भाविकांचा पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रवास सुरू आहे. या प्रवासात त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. राज्यासह देशभरातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अनेक ठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असून स्पेशल एक्स्प्रेस आणि ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
advertisement
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेनं 3 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकादशीनिमित्त 17 जुलै रोजी नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद या स्थानकांतून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नगरसोल-पंढरपूर, आदिलाबाद-पंढरपूर आणि अकोला-पंढरपूर या स्पेशल ट्रेनचं नियोजन करण्यात आलंय. नगरसोल-पंढरपूर ही रेल्वे रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर, धाराशीव आणि कुर्डुवाडी स्थानकांवर येताना, जाताना थांबेल. या रेल्वेत 4 स्लीपर क्लास आणि 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. अकोला-पंढरपूर ही रेल्वे वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, सोलापूर, कुर्डुवाडी स्थानकांवर थांबेल. या रेल्वेत 1 वातानुकूलित, 4 स्लीपर क्लास आणि 17 द्वितीय श्रेणीचे डबे असतील. तर, आदिलाबाद-पंढरपूर ही रेल्वे किनवट, बोधडी, धानोरा, सहस्रकुंड, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी इथं थांबेल. या रेल्वेत 2 स्लीपर क्लास आणि 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
हेही वाचा : आषाढीसाठी धावणार विशेष एक्स्प्रेस; कुठपासून, कुठपर्यंत? संपूर्ण वेळापत्रक
दरम्यान, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी विशेष नियोजन करतं. यावर्षीदेखील जालना विभागातून पंढरपूरसाठी विशेष गाड्यांचं नियोजन एसटी महामंडळानं केलं आहे. डबल 120 बसेस आषाढी वारीसाठी सज्ज झाल्या आहेत.
यंदा जालना जिल्ह्यातील एसटीच्या विविध आगारांतून 120 गाड्या सोडण्याचं नियोजन महामंडळाकडून करण्यात आलंय. दरवर्षी जालन्यातून हजारो वारकरी पंढरपूरला आषाढी वारीसाठी जातात. यंदा राज्य परिवहन महामंडळाकडून वारकऱ्यांसाठी अधिकच्या बसची सोय करण्यात आली आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून मात्र केवळ एकच गाडी मराठवाड्यातून सोडण्यात आलीये.