सातारा, 24 ऑगस्ट : 'आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार आहे. आमचे 10 ते 12 आमदार येतील. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल आम्ही उठलो तर सरकार उठेल, असं खळबळजनक विधान माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा तिसरा खातेवाटप रखडलेला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक अजूनही प्रतिक्षेत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू सुद्धा यांचा या यादीत समावेश आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीबद्दल भाष्य केलं आहे.
advertisement
'आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार आहे. आमचे 10 ते 12 आमदार निवडून येतील, असा दावाच आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
तसंच, महायुतीत एकनाथ शिंदे,अजित पवार आणि भाजप ऐवढे पक्ष असताना तुम्हाला एवढ्या जागा मिळणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, 'तो अभ्यास त्यांनी करावा ते माझे काम नाही आमचे 10 ते 11 आमदार निवडून येतील आणि आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल आम्ही उठलो तर सरकार उठेल' असं परखड मत बच्चू कडु यांनी व्यक्त केलं आहे.
(आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाने दिलं 6 हजार पानी उत्तर; विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय देणार)
दरम्यान, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आगामी निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा काय करायचं हे तेव्हा ठरवलं जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
...म्हणून शिंदे सरकारमध्ये सामील - बच्चू कडू
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना बच्चू कडू यांनी 'शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शामिल झालो, असा खुलासाच केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाण्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं, असा खुलासा बच्चू कडू यांनी भर सभेत केला.
माझ्या दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय केलं, तरच मी तुमच्यासोबत येतो, असं बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला. 50 खोके आणि गद्दार म्हणून आम्ही बदनाम झालो. परंतु, मला त्याचं काही वाटत नाही. कारण दिव्यांग मंत्रालय झालंय. शिवाय अनेक जण मंत्रिपद मागत होते. मला मंत्रालयच भेटलं आता मंत्रिपदाचं काय काम आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.