बैठकीसाठी कमालीची गुप्तता
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी काल रात्री एक विशेष बैठक पार पडली, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या बैठकीसाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि कोणालाही आत प्रवेश दिला गेला नव्हता. महायुतीमध्ये सध्या जागावाटप आणि रणनीतीवरून चर्चा सुरू असतानाच पार पडलेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
advertisement
एक सदिच्छा भेट आणि चहापानाचा कार्यक्रम
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही केवळ एक सदिच्छा भेट आणि चहापानाचा कार्यक्रम असल्याचे सांगत विषय हातावेगळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार नितीन पाटील यांनी ही एक प्राथमिक स्तरावरील चर्चा असल्याचे मान्य केले. जरी त्यांनी भाजपला कुठेही डावलले नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी या बैठकीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, मंत्री मकरंद पाटील यांनी या सर्व प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन पाळणे पसंत केलं. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व
दरम्यान, आता जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर वर्चस्व राहिले आहे. भाजप असो किंवा शिवसेना यांना यामध्ये फारसे महत्त्वाचे स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता भाजप साताऱ्यात आपली ताकद दाखवण्याआधी स्थानिक नेत्यांनी आपली रणनिती तयार करण्यास सुरूवात केली आहे.
