सातारा : राज्यातील पहिले सौर ग्राम होण्याचा मान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मान्याची वाडीला मिळाला आहे. या गावातील सर्व घरांवर सोलर बसवले आहेत. यामुळे या गावाचा शून्य वीज बिलाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. याचबाबत लोकल18 चा हा विशेष आढावा.
महाराष्ट्रातील पहिले विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले सौर ग्राम ठरलेल्या मान्याची वाडीची ख्याती आता देशभर पसरली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या एक्स या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने मान्याची वाडीची माहिती आता देशाला दिली आहे.
advertisement
गावाचे सरपंच रवींद्र माने यांनी याबाबत विशेष माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या व राज्यातील पहिले सौरग्राम ठरलेल्या मान्याची वाडीची ख्याती आता देशभर पसरली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या ‘एक्स’ (ट्विटर) प्लॅटफॉर्मद्वारे केंद्र सरकारने मान्याची वाडीची माहिती आता देशाला दिली आहे.
18 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाचे ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ म्हणून लोकार्पण झाले होते. राज्यातील या कामाची दखल केंद्रीय अपारंपरिक मंत्रालयाच्या अखत्यारित ‘प्रधानमंत्री सूर्यघर – मोफत वीज योजनेच्या’ एक्स प्लॅटफॉर्मने घेतली आहे. मान्याची वाडीने शून्य वीज बिलाच्या दिशेने प्रवास सुरु केल्याचे संदेशात म्हटले आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही मान्याची वाडीची पहिले सौर ग्राम म्हणून दखल घेतली आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली मान्याची वाडी तसे छोटेसे गाव आहे. या गावात एकूण वीज ग्राहकांची संख्या 102 आहे. यामध्ये घरगुती 97, औद्योगिक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे प्रत्येकी एक तर सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 2 ग्राहकांचा समावेश आहे. गावचा वीजवापर दरमहा सरासरी साडेपाच हजार युनिटच्या घरांत असतो. या पूर्वी या गावाने महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा लाभ घेत छापील वीज-बील नाकारुन सवलत घेतली होती. त्यामुळे मान्याचीवाडीचे उपक्रमशील सरपंच रविंद्र माने यांना महावितरणने प्रधानमंत्री सूर्यघर- मोफत वीज योजनेची माहिती दिली.
मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO
या योजनेला माने यांनीही लगेच प्रतिसाद दिला. यानंतर 25 जूनला ग्रामसभा घेत मान्याची वाडीने सूर्यघर योजनेत 100 टक्के सहभाग घेण्याचा निर्धार केला. त्यासाठी लागणारी तांत्रिक गरज पूर्ण करत महावितरणने नवीन वीज रोहित्र उभारुन क्षमता वाढ केली. प्रत्येक घरावर एक किलोवॅटचे टाटा कंपनीचे सौर यंत्रणा बसविण्याचे ठरले आणि अवघ्या दीड महिन्यांत गावातील 102 वीज जोडण्या सौर ऊर्जेवर रुपांतरीत झाल्या.
pune flood : महिना उलटूनही पुण्यातील पूरग्रस्तांना खरंच मदत मिळाली का?, Ground report, VIDEO
घरगुती वगळता पाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालयासाठी जादा भाराची सौर प्रणाली बसविल्यामुळे गावाची सौर क्षमता 109 किलोवॅट झाली आहे. एक किलोवॅटचा सौर संच महिन्याला साधारणत: 120 युनिट वीज निर्मिती करणार असून, गावात दरमहा 13 हजार युनिट वीज तयार होणार आहे. त्यामुळे गाव विजेच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.