विधानसभा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या अर्थात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये मविआचा उमेदवारच रिंगणात नसल्याने काँग्रेस गायब झाल्याची टीका विरोधक करीत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर टीका करताना 'गायब काँग्रेस' असा शब्दप्रयोग केला. सोमवारी दुपारपासून संपूर्ण राज्यात कोल्हापूर उत्तरबाबतीत जोरदार चर्चा झाली. सतेज पाटील यांचे आक्रमक रुप धारण केल्याची चित्रफीत राज्यात व्हायरल झाल्यानंतर होमग्राऊंडवर धक्का बसल्याची भावना व्यक्त होऊ लागलेली होती. त्यामुळे साहजिक सतेज पाटील यांना दु:ख झालेले होते.
advertisement
सोमवारी सायंकाळी शेकडो कार्यकर्ते सतेज पाटील यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले. यावेळी सतेज पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांचे अपार प्रेम पाहून सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. जे काही झाले ते तुमच्या समोर आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हा लोकांची साथ गरजेची आहे, असे म्हणत असताना सतेज पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
झक मारायला मला तोंडघशी पाडलं का? सतेज पाटलांच्या संतापाचा कडेलोट
अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने सतेज पाटील तोंडघशी पडले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलून त्यांनी लाटकर यांच्याऐवजी छत्रपती घराण्यात उमेदवारी द्यायला लावली. मात्र त्यांनीच अंतिम क्षणी माघार घेतल्याने सतेज पाटील यांच्या संतापाचा पारा चढला. कशाला झक मारायला मला तोंडघशी पाडले? दम नव्हता तर उमेदवारी घ्यायची नव्हती ना... मी पण माझी ताकद दाखवली असती... अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रागारागाने ते जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.
