प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनेक समस्या आणि तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या . अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या .तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. परंतु, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.
advertisement
विद्यार्थ्यासाठी एसटीची हेल्पलाईन सुरू
शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना अनेकदा बसेस उशिरा सुटणे किंवा बऱ्याचदा त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते, त्यामुळे त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने '1800221251' हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. तरी या क्रमांकावर विद्यार्थी - विद्यार्थ्यांनींनी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात.
विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर
एवढंन नाही तर एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते . विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक आणि त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. या पुढे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5-6 या वेळेत मुख्य बसस्थानक आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होतो अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे.
शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बस मधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून जावू नये,अशा सक्त सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा- महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकार्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे. असे थेट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत.
