हिंगोली : शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिक नुकसानीची आर्थिक मदत न मिळाल्याच्या कारणातून नांदेड व परभणीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्याची घटना घडली आहे.शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चाकरांच्या गाड्या फोडू नका... सत्ताधाऱ्यांना पकडा... सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा.. सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे मान्य होणार नाहीत..., असं वादग्रस्त वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी हिंगोलीत केलं आहे. सुजात आंबेडकरांच्या उपस्थित आज हिंगोलीत पक्ष प्रवेश झाला, त्यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते.
advertisement
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अधिकारी हे शासनाचे चाकर आहेत ते शासनाच्या आदेशावरून काम करतात. चाकरांना पकडू नका... पकडायचे असेल तर सत्ताधाऱ्यांना पकडा, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा... सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे मान्य होणार नाहीत.
परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक
परभणीतह शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. संजयसिंह चव्हाण हे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. यानंतर शेतकऱ्याने सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. संतोष पैके असे या शेतकऱ्याचे नाव असून ते परभणीच्या पालम तालुक्यातील चाटोरी येथील आहेत. त्यांना सध्या नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..
नांदेडमध्ये तहसिलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने थेट तहसिलदारांची गाडी फोडल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणी, 34 वर्षीय शेतकरी साईनाथ खानसोळे याला पोलिसांनी अटक केली आहे तहसील कार्यालयातच तहसीलदाराचे वाहन उभे होते, इथेच जाऊन त्याने तहसिलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.साईनाथ खानसोळे असं या शेतकऱ्याचे नाव आहे
शेतकरी आक्रमक
राज्याच्या विवध भागात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. अतिवृष्टीग्रस्त असूनही आपल्याला शासनाच्या अनुदानाचा अद्यापही लाभ न मिळाल्याने आपण गाडीची तोडफोड केल्याचं शेतकऱ्यांनी म्हटले आहे. . सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही, असे म्हणत शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
