मुंबई : देशातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दिशेने केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले जात आहे. देशातील सहा राज्यांना जोडणारा सुरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असून, या प्रकल्पात महाराष्ट्रातील नाशिक शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा द्रुतगती मार्ग सुरतपासून सुरू होऊन थेट चेन्नईपर्यंत जाणार असून, नाशिकमधून जाणारा सहा पदरी एक्सप्रेसवे हा या कॉरिडोरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
advertisement
कसा फायदा होणार?
या महामार्गामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होणार आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातून हा मार्ग गेल्याने धार्मिक, औद्योगिक आणि व्यापारी दृष्टीने शहराला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या एक्सप्रेसवेमुळे नाशिक, अक्कलकोट आणि पुढे दक्षिण भारतातील महत्त्वाची धार्मिक स्थळे एकाच मार्गाने जोडली जाणार आहेत. नाशिकहून थेट अक्कलकोटला जाणे आता अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे.
2 बंदरांना जोडणार
या द्रुतगती मार्गाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो दोन प्रमुख बंदरांना जोडणार आहे. नाशिकमधून पुढे हा महामार्ग पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. तसेच पुढे चेन्नई बंदराशीही थेट संपर्क साधला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागातून मालवाहतूक थेट पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत जलदगतीने करता येणार आहे. यामुळे निर्यात-आयातीला चालना मिळण्याबरोबरच उद्योगधंद्यांसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
दोन टप्प्यात प्रकल्प
हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक ते अक्कलकोटपर्यंतचा मार्ग पूर्ण केला जाणार आहे. हा टप्पा सुमारे 374 किलोमीटर लांबीचा असणार आहे. सध्या नाशिक ते अक्कलकोट हे अंतर सुमारे 524 किलोमीटर असून, या प्रवासासाठी साधारण नऊ तासांचा वेळ लागतो. मात्र नवीन एक्सप्रेसवेमुळे हे अंतर सुमारे 150 किलोमीटरने कमी होणार आहे. परिणामी प्रवासाचा कालावधी जवळपास पाच तासांनी घटून अवघ्या चार तासांत नाशिक ते अक्कलकोटचा प्रवास पूर्ण करता येणार आहे.
नाशिक अक्कलकोट 4 तासांत
सुरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा सहा राज्यांमधून जाणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू अशी ही राज्ये या महामार्गामुळे थेट जोडली जाणार आहेत. हा महामार्ग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरण्याची शक्यता आहे. नाशिकहून चेन्नईकडे जाणारा मार्ग आंध्र प्रदेशातून जात असल्याने तिरुपतीसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळापर्यंत थेट आणि जलद प्रवास शक्य होणार आहे.
सध्या नाशिक ते चेन्नई प्रवासासाठी 22 ते 23 तासांचा वेळ लागतो. मात्र हा नवीन महामार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवासी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्रासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून, नाशिकच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
