शिंदेंची पाळेमुळे उखडून काढण्याचा भाजपकडून प्रयत्न, याची त्यांना भणक लागलीये
सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी जाहीर सभांमध्ये आपापल्या मंत्र्यांना फोन लावत आहेत आणि तिथून अमुक काम होईल का? तमुक कसा करता येईल या संबंधाने विचारणा करत आहेत..? हे बोलणे तसे हास्यास्पदच आहे. पण त्यांना असे का बोलावे लागत आहे याचा कधी आपण मानसशास्त्रीय विचार केलाय का? नगरपरिषद निवडणुकीच्या विविध प्रचार सभांमधून अजित दादा सांगताहेत, तिजोरी माझ्याकडे आहे. शिंदेंचे आमदार सांगताहेत तिजोरी तुमच्याकडे असली तरी चाव्या आमच्याकडे आहेत. तर फडणवीस स्वतःच सांगत आहेत तिजोरी एकाकडे असली चाव्या दुसऱ्याकडे असल्या तरी तिजोरीतला माल आमचा आहे.
advertisement
माणूस आतून असुरक्षित असला की तो अधिक आक्रमक आणि हिंसक होतो
थोडक्यात काय आपण कसे अधिक शक्तिशाली आर्थिक दृष्ट्या सामर्थ्यवान हे सांगण्याचा आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण या प्रयत्नात शिंदेंनी अतिशयोक्तीची परिसीमा गाठली. शिंदेंच्या या वागण्याची सर्वत्र खिल्ली उडवली जात असली तरी शिंदे वारंवार पुन्हा पुन्हा प्रत्येक सभेत तीच कृती का करत आहेत. मानसशास्त्र सांगते माणूस आतून असुरक्षित असला की तो अधिक आक्रमक आणि हिंसक होतो. शिंदे आतून असुरक्षित झाले आहेत का? होय, शिंदे असुरक्षित झाले आहेत किंबहुना शिंदेंची पाळेमुळे उखडून काढण्याचा जणू कुणी प्रयत्न करत आहे... याची आता शिंदेंना भणक लागली आहे, असे अंधारे म्हणाल्या.
शिंदेंच्याच नेत्यांमागे चौकशा कशा लागल्या?
संजय शिरसाट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आणि गैरमार्गाने जमवलेल्या मायेची चौकशी लागली आहे. संतोष बांगर यांनी गद्दारी करण्यासाठी पन्नास कोटी घेतले हे भाजप आमदाराने जाहीर वृत्तवाहिन्यांवर स्पष्ट करून सांगितले. आपले सख्खे वडील भाजपाच्या केंद्रीय सत्तेमध्ये मंत्री आणि सख्खा भाऊ राज्य सरकारमध्ये मंत्री असताना सुद्धा निव्वळ शिंदेच्या पक्षात असल्यामुळे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. इथे हे उल्लेखनीय आहे की, अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असणाऱ्या पार्थ पवारवर अजिबात गुन्हा दाखल झाला नाही...! मात्र ज्यांचे वडील आणि सख्खे बंधू भाजपच्या सत्तेतले मंत्री आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय! त्याचं कारण निव्वळ ते शिंदेंना साथ देत आहेत, असे दावे अंधारे यांनी केले.
काल सांगोल्याचे शहाजीबापू यांच्या घरी धाड पडली. रवींद्र चव्हाण हे जाहीर सभांमधून एक नंबर महत्त्वाचा असतो, दोन नंबर काही कामाचा नाही हे उघडपणे सांगायला लागले. विशेष त्याला उलटून उत्तर देण्याची हिंमत उदय सामंत यांनी दाखवली नाही. मागच्या दोन-तीन महिन्यांपासून शिंदेंच्या मागे भाजपाने लावलेले हे शुक्लकाष्ट बघता काय धाडी... काय चौकशी...काय गोंधळ... शिंदेंचा कार्यक्रम कसा ओकेमध्ये लागला आहे
भाजपाकडून शिंदेंना जायबंदी करण्याचे अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत आतून कितीही भेदरून गेलेली अवस्था असली तरी सुद्धा, मी ताकदवान आहे. मी अत्यंत प्रभावशाली आहे. हे आपल्या साथीदारांना पटवून देणे शिंदेंची गरज आहे. अन्यथा एक फार मोठा गट भाजपकडे सहज जाऊ शकतो किंबहुना शिंदेंच्या सोबत असणाराच विश्वासू माणूस असे घडवून आणू शकतो...! तेव्हा आपल्या साथीदारांना आणि मतदारांना सुद्धा मी आहे हे पटवून देण्यासाठी शिंदेंना अशी मोठमोठी विधाने करणे , आश्वासन देणे आणि भर सभेतून फोन लावणे हे प्रकार करावे लागत आहेत. मुळात हे सगळे प्रयत्न म्हणजे धास्तावलेल्या मनाचे लक्षण आहे, असेही अंधारे म्हणाल्या.
