ठाण्याला भातसा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरण क्षेत्रात दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे नदीपात्रात आणि जलकुंभांत भरपूर गाळ वाहून झाला आहे. त्यामुळे पाणी गढूळ झालं आहे. अशा पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी काही दिवस पिण्याचं पाणी उकळून प्यावं, असं ठाणे महापालिकेनं आवाहन केलं आहे. शिवाय, पुढील काही दिवस ठाणेकरांना अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे.
advertisement
Health Tips : दुध-खारीक वजन वाढवण्यासाठी उत्तम, आजारही ठेवते दूर; पाहा खाण्याची योग्य पद्धत..
पावसाळ्यात जलजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. पावसाच्या पाण्यामुळे रोगजंतू पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळतात आणि ते दूषित होते. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड आणि हिपॅटायटीस ए यांसारखे जलजन्य आजार होतात. ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची सध्याची स्थिती बघता आजारांचा धोका जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचं पाणी उकळून प्यायलं पाहिजे.
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत फार दक्षता घेतली पाहिजे. कारण, पाण्याच्या माध्यमातून टायफॉईड आणि अतिसारासारखे आजार होऊ शकतात. पाणी फिल्टरचं असलं तरीही त्याचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण झालेलं नसतं. कधीकधी त्या पाण्यातूनही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात पिण्याचं पाणी उकळूनच प्यायलं पाहिजे. पाणी उकळून पिण्याची पारंपारिक पद्धत फायद्याची आहे. तुम्ही दररोज सकाळी पाणी उकळून ते थंड करून नंतर पिण्यासाठी वापरू शकता. यामुळे पावसाळ्यात पाण्यातून होणारा संसर्ग रोखला जातो.