नुकतेच नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गिकेच्या वेगाची चाचणी केलीये. ही चाचणी यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र अद्याप महामेट्रोला मिळालेले नाही. परंतु, सिडकोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणी यशस्वी झाली असून लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 किलोमीटर वेगाने सुसाट धावणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवसाचा वेळ वाचणार आहे.
advertisement
जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार, काय आहे कारण?
सिडको महामंडळाने बांधलेल्या नवी मुंबई मेट्रोचे संचलन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोकडून सुरू आहे. आतापर्यंत या मेट्रोसेवेचा 60 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. सिडकोला तिकीट दरातून 14 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बेलापूर ते पेणधर या 11.1 किलोमीटरच्या अंतरावर मेट्रोची 11 विविध स्थानके आहेत. 20 जानेवारीपासून सिडकोने मेट्रो मार्गावर सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केलीये.
गर्दीच्या काळात बेलापूर येथून सकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5.30 ते 8 वाजेपर्यंत दर दहा मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या सुटतात. तर पेणधर येथून सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 7.30 दरम्यान दर 10 मिनिटांनी मेट्रोची फेरी झालीये. गर्दीच्या वेळा वगळून उर्वरित काळात बेलापूर व पेणधर येथून दर 15 मिनिटांनी मेट्रो धावते.
दीड महिन्यात प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता
दरम्यान, नुकतेच नवी मुंबई मेट्रोला आयएसओ 9001 – 2015 हे मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता व्यवस्थापन, व्यावसायिक स्वास्थ्य तथा सुरक्षा व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली ही तिन्ही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी राज्यातील एकमेव मेट्रो सेवा आहे. जानेवारी महिन्यात नवी मुंबई मेट्रोच्या गतीची चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, अद्याप चाचणीचे प्रमाणपत्र सिडकोला मिळाले नाही. पुढील दीड महिन्यात वेगाचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असून मेट्रोची गती वाढवण्यात येणार आहे.