मृत तरुणाचे नाव राहुल विश्वकर्मा असे असून तो डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री छट पूजेच्या निमित्ताने राहुलचे आई-वडील, मोठा भाऊ आणि बहीण प्रिया हे चौघे पवईतील पवारवाडी घाटावर गेले होते. सर्वांना घेऊन जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसल्याने त्यांनी घरी असलेल्या राहुलला फोन करून स्कूटरवर येण्यास सांगितले. राहुल सुमारे 15 मिनिटांत स्कूटर घेऊन घाटावर पोहोचला आणि आपल्या बहिणीला बसवून घरी परत निघाला.
advertisement
रात्री झाला घात..
रात्री साडेआठच्या सुमारास दोघे पवई प्लाझाजवळ पोहोचले असता, एका पर्यटक बसने त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. या धडकेत राहुलचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या उजव्या बाजूला पडला. याच वेळी बसच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. प्रिया मात्र डावीकडे फेकली गेल्याने तिला किरकोळ दुखापत झाली. ती तात्काळ शुद्धीत आली आणि मदतीसाठी ओरडली. तिथे उपस्थित असलेला एक व्यक्ती त्याच्या मदतीला धावला आणि त्याच्या मोबाईलवरून प्रियाने कुटुंबाला घटनेची माहिती दिली.
तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र...
घटनास्थळी लोकांना तरुणाला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले, असे प्रिया विश्वकर्माने तक्रारीत म्हटले आहे.
बसचालक फरार
अपघातानंतर बसचालक शंकर एस हा घटनास्थळावरून पळाला. परंतू काही वेळानंतर लगेच पळून गेलेल्या बस चालकाने स्वतःहून पवई पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या शरीरात मद्याचे कोणतेही अंश आढळले नाहीत. पोलिसांनी त्याच्यावर बेपर्वाईने वाहन चालवून मृत्यू घडविणे तसेच धोकादायक वाहनचालना या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांचा वेग आणि रस्त्यावरील बेफिकीर वाहनचालकांमुळे अनेक जीव जात आहेत. पवई पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बस चालकाला न्यायालयीन प्रक्रियेनंतर योग्य ती शिक्षा होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
