सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सगळ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीच्या आधीच सगळ्याच राजकीय पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यातच आता मोठी घडामोड घडली आहे. अंडरवर्ल्डमध्ये दबदबा तयार केल्यानंतर राजकारणात आलेल्या डॅडी अरुण गवळी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरेंचा शिलदार दगडी चाळीत गेल्याने चर्चांना उधाण आले.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे सचिव, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी भायखळ्यातील दगडी चाळीत देवीचे दर्शन घेतले. या देवीची प्रतिष्ठापना अरुण गवळी आणि कुटुंबीयांकडून करण्यात येते. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेच्या नेत्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांची भेट घेतली. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
अखिल भारतीय सेनेच्या नेत्या आणि माजी नगरसेवक गीता गवळी यांनी नुकतीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची घोषणा करताना आपल्यासह बहीण योगिता गवळीदेखील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर नार्वेकर यांनी गीता गवळी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात नार्वेकर यांनी गीता गवळी यांची भेट घेतली होती. त्यानंतर गवळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भायखळा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, भायखळ्यातून गीता गवळी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे मनोज जामसूतकर यांनी विजय मिळवला. त्यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला होता.
शेलार यांनीही घेतली होती गीता गवळींची भेट...
दरम्यान, महिन्याभरापूर्वी भाजपचे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांचीही गीता गवळी यांनी भेट घेतल्याने त्यांचा आगामी राजकीय प्रवास कोणत्या दिशेने होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भायखळ्यात गवळी कुटुंबाचा प्रभाव मोठा असल्याने, त्यांच्या irहालचालींना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.