मुंबईत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने सत्तेत जायचे असल्यास एकमेकांच्या पाठिंब्यावर जायला लागेल, हे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात महापौरपदाची मनीषा आहे. जर देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होईल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर पडड्याआद काही गोष्टी घडत असल्याचे सूचक संकेत मिळतायेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले नगरसेवक पुन्हा आले तर त्यांना सामावून घ्याल का? असे विचारले असता 'तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या' असे मिश्किलपणे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
भाजपचा महापौर बसवून आपण काय पाप करतोय याचा शिंदेंनी विचार करावा
आमचा (शिवसेनेचा) महापौर होईल असा आकडा आमच्याकडे सध्या नाहीये. भाजपच्या लेखी आमचा पराजय असला तरी आमच्या पराजयाला तेज आहे, त्यांचा विजय देखील डागाळलेला आहे. ज्यांच्या सहकार्याने ते महापौर बनवणार आहेत आणि जे त्यासाठी सहकार्य करणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, आपण हे काय पाप करतोय. कुणी महापौर बसवावा, न बसवावा याची मला चिंता नाही. माझ्यापुढे तो प्रश्न नाही. पण बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे हीच होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप अॅनाकोंडा, अंबरनाथमध्ये शिंदेंसोबत त्यांनी काय केले? उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंप्रति सहानुभूती
भाजप म्हणजे अॅनाकोंडा आहे. गरज असेल तिथे वापरणार, गरज संपली की फेकून देणार. अंबरनाथमध्ये त्यांच्यासोबत भाजपने हेच केले, अशी सहानुभूतीही उद्धव ठाकरे यांनी आश्चर्यकारकरित्या व्यक्त केली. भाजपचा डाव कळेपर्यंत त्यांचा पक्ष आणि बाकी सगळं संपवून गेले असेल, असेही ठाकरे म्हणाले.
...तर भाजपने आकाश पाताळ एक केले तरी महापौरपदापर्यंत गेले नसते
जर सेना फोडली नसती तर भाजपने आकाश पाताळ एक केले असते तरी ते मुंबईत कदापि महापौरपदी बसले नसते. आताचे निकाल पाहूनही तुम्हाला बरंच काही लक्षात येईल, असे उद्धव ठाकरे सूचकपणे म्हणाले. दोन्ही शिवसेनेची बेरीज केली असता ती जवळपास ९४ होते, म्हणजेच भाजप पेक्षा हा आकडा जास्त आहे, हेच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
