मुंबई: तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यामध्ये 100 वर्षांच्या ज्येष्ठांपासून ते पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या 'झेन-झी' मतदारांपर्यंत सर्वांचा सहभाग होता. मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मतदारांमधील निरुत्साह चिंतेचा विषय ठरला आहे.
advertisement
मुंबईत मतदानाची संथ गती; कुलाब्यात सर्वात कमी प्रतिसाद
मुंबईत दुपारी 3:30 वाजेपर्यंत केवळ 41.08% मतदान झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे कुलाबा येथील वॉर्ड 227 मध्ये याच वेळेपर्यंत अवघे 15.73% मतदान नोंदवले गेले, जे राज्यातील सर्वात कमी मतदान असू शकते. 5:30 वाजेपर्यंतची अंतिम आकडेवारी आल्यानंतर टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता राज्यातील जनतेला सर्वाधिक उत्सुकता लागली आहे ती म्हणजे निकालाची होय. उद्या म्हणजेच शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिल्या 3 तासात राज्यातील सर्व पालिकेतील चित्र स्पष्ट होईल. दरम्यान मतदान झाल्यानंतर काही एक्झिट पोलचे अंदाज समोर आहेत. ज्यात मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
| महानगरपालिका | मतदानाची टक्केवारी (%) |
| कोल्हापूर | ५०.८५ (सर्वात जास्त) |
| परभणी | ४९.१६ |
| अहिल्यानगर | ४८.४९ |
| नवी मुंबई | ४५.५१ |
| ठाणे | ४३.९६ |
| नागपूर | ४१.२३ |
| पिंपरी चिंचवड | ४०.५० |
| पुणे | ३६.९५ |
| जळगाव | ३४.२७ (सर्वात कमी पैकी एक) |
