रामदास तडस नेमके काय म्हणाले?
"आज सकाळी १० वाजता राम मंदिरात दर्शनाला गेलो. बायको होती, काही कार्यकर्तेही सोबत होते. राम आमच्या हृदयात आहे, माझी आस्था आहे. दरवर्षी मी तिथे जात असतो. पण यावेळी मला वेगळा अनुभव आला. यावर्षी मला मुर्तीची पूजा करण्यास मनाई केली. सोवळे घातलेले नाही, जानवे घातले नाही म्हणून तुम्ही पूजा करू शकत नाही, तुम्ही दुरून दर्शन घ्या असे त्यांनी मला सांगितले. तो पुजारी मंदिराचा ट्रस्टी आहे, तो पुण्याला राहतो. फक्त रामनवनीला येतो. त्याला आमच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनी दरवर्षीचा नित्यक्रम आणि परंपरा सांगितली. मात्र तरीही पुजेसाठी त्याने आम्हाला नकार दिला.
advertisement
मग मीच सर्वांना समजावून चांगल्या दिवशी वाद नको, ते नाही म्हणतात तर आपणही हट्ट करायला नको. रामाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात आस्था आहे. बाहेरून दर्शन घेऊन परत फिरू, असे कार्यकर्त्यांना सांगून आम्ही तिथून निघून आलो. परंतु आमच्यासाठी हा प्रकार धक्कादायक होता" असे रामदास तडस झी २४ ताससोबत बोलताना म्हणाले.
घटनानेनंतर तडस समर्थक आक्रमक
या प्रकारामुळे रामदास तडस यांचे समर्थक आक्रमक झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमीदिवशी आम्ही पूजा करीत असतो. मग यंदाच्या वर्षी आम्हाला पूजा करण्यापासून रोखण्याचे कारण काय? असा सवाल करीत तडस समर्थकांनी ट्रस्टींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
पूजा करण्यास मनाई करण्यामागचे नेमके कारण काय होते, यावर मंदिर ट्रस्टकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या घटनेनंतर तडस समर्थक आणि काही स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
भाजपच्या राजकीय प्रवासात राम मंदिर आंदोलन गेमचेंजर
1980 च्या दशकात, भाजपचा राजकीय प्रवास वेगाने उभारी घेऊ लागला आणि त्यात राम जन्मभूमी आंदोलन हा एक प्रमुख टप्पा ठरला. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्याच्या मागणीने भाजपने संपूर्ण देशात भावनिक लाट निर्माण केली. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने राम मंदिराचा मुद्दा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर भाजप सरकारच्या कार्यकाळात अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाली, आणि 2024 मध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. हा भाजपसाठी ऐतिहासिक क्षण ठरला.