खैराटी पारधी बेड्याचं भीषण वास्तव
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत खैराटी पारधी बेडा आहे. या गावात 45 ते 50 घरे आहेत. 50 ते 60 वर्षांपासून हे लोक इथे वास्तव्यास आहेत. पारधी बेड्यातील एका व्यक्तीची प्रकृती बिघडली. त्याचे कुटुंबीय त्याला रात्री सेवाग्राम येथील रुग्णालयात घेऊन जायला निघाले. मात्र गावातील कच्च्या आणि पावसाळ्यामुळे अतिशय वाईट अवस्था असलेल्या रस्त्याने कशीबशी वाट काढत असताना रुग्णाचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर शवविच्छेदन झाल्यावर रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी चक्क बैल बंडी वापरावी लागली. अंत्ययात्रा देखील कशीबशी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आली.
advertisement
लालपरीतून प्रवास केला, आता एसटी स्थानक घेऊ शकता दत्तक, काय आहे योजना?
गावात नळाच्या पाण्याची सुविधा नाही
या पारधी बेड्यातील नागरिकांची समस्या साधीसुधी नाही. गावात अजूनही नळाच्या पाण्याची सुविधा नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. खाटेवरून किंवा बैलबंडीवरून अंत्ययात्रा काढणे हे गावकऱ्यांनी पहिल्यांदाच केलेलं नाही. तर सुविधांच्या अभावामुळे पारधी बेड्यात अनेकदा अशाच प्रकारे बैलबंडी किंवा खाटेवरून अंत्ययात्रा काढावी लागते. जंगलासारखा परिसर किंवा शेतांमधून वाट काढत दोन अडीच किलोमीटरावर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत न्यावी लागते, असे गावकऱ्यांनी सांगितले.
गावकऱ्यांच्या निवेदनाची दखल नाही
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि भारत चंद्रावर जाऊन पोहोचला. मात्र अशा प्रकारच्या पारधी बेड्यावर आजही रस्त्याअभावी रुग्णांना खाटेवरून रुग्णालयात नेण्यासाठी वाट काढावी लागते. अंतिम यात्रा ही खाटेवरून किंवा बैलबंडीने काढावी लागते. कारण काय तर नागरिकांना रस्त्याची सुविधाच नाही. गावकरी गेल्या कित्येक वेळ प्रशासनाला निवेदन देत आहेत. मात्र प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही, असे मृताचे भाऊ सुनील भोसले यांनी सांगितले.
कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर, ब्रिटिश काळात काय घडलं? Video
बेड्यातील नागरिकांना मिळेल रस्ता ?
वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या पारधी बेड्यातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय अंदाजे 10 ते 15 किलोमीटर तर सेवाग्राम रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मात्र मुख्य रस्त्यांपर्यंत आणणारा त्यांच्या गावातील एक कच्चा रस्ता पक्का बनविण्यासाठी आता गावकऱ्यांना किती वेळ वाट बघावी लागणार आणि किती जणांच्या अंत्ययात्रा अशाच पद्धतीने काढाव्या लागणार हा एक प्रश्नच आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रशासन ऐकेल आणि या गावकऱ्यांना पाण्याची आणि पक्क्या रस्त्याची सुविधा मिळेल हीच अपेक्षा.